आवाज महाराष्ट्राचा.LIVE
प्रतिनिधी : आरिफ शेख
खेड/आळंदी : खेड तालुक्यातील पाईटजवळ घडलेल्या कुंडेश्वर अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या भीषण घटनेत सुमारे दहा महिलांचा मृत्यू झाला असून इतर अनेकजण गंभीर जखमी आहेत. श्री तीर्थक्षेत्र कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारच्या दर्शनासाठी निघालेल्या महिलांना घेऊन जाणारे पिकअप वाहन चढावर नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळले. त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुःखद घटनेबाबत राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असताना, राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या वतीनेही शोकसभेचे आयोजन करण्यात आले. वकील बार रूममध्ये झालेल्या या शोकसभेला अध्यक्ष एडवोकेट वैभव कर्वे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
एडवोकेट वैभव कर्वे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर ही दुर्घटना कोसळली, हा अत्यंत हृदयद्रावक प्रकार आहे. मृतांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जखमींचा लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”
शोकसभेत उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली. अपघातातील पीडित कुटुंबांना शासनाने योग्य ती मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.








